Skip to main content

९. शर्थीने खिंड लढवली

 पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला : अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठीच त्याने सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. त्याची मोठी फौज घेऊन सिद्धी जौहर निघाला. फाजलखान हि बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला.

.........................................................................................

          शिवभक्त- स्वामीनिष्ठावान वीर बाजीप्रभू देशपांडे
.........................................................................................

पन्हाळगडा विषयी थोडंसं :

१. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला समजल्या जातो. त्याचे निर्माण शिलाहार घराण्याचा राजा भोजराजा नृसिंह ह्याने १२०० वर्षाआधी केले होते. तो किल्ला नागवंशीय वंशाकडे असल्यामुळे त्याचे नाव पाली भाषेत होते आणि ते म्हणजे ' पन्नग्नालय ' .आणि त्याचा अर्थ अजिंक्य असा होतो.

२. पन्हाळगडावर इ.स.१६६० मध्ये सिद्दी जोहरने हल्ला केला होता. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. ते ६०० मावळ्यासोबत गुप्त रस्त्याने विशाळगडावर गेलेत. त्यांच्यासारखा दिसणारा शिवाजी काशीद/महाला आणि बाजी प्रभू देशपांडे हे घोडखिंड अडवून राहिलेत आणि सिद्दीच्या सैन्याला अडवून ठेवले त्यात त्यांना हौताम्य प्राप्त झाले.नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडखिंडीचे नामांतर करून पावनखिंड असे केले.

३. इ.स.१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद ह्यांनी पन्हाळ्याला काबीज करून त्याला स्वराज्यात शामिल केले.


.........................................................................................

पन्हाळगडाचा वेढा : सिद्दी जौहर शूर पण क्रुर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. त्यामुळे पावसाळा सुरू झाला, की सिद्दी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे?शक्तीचे काम नाही. तेंव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. " लवकरच किल्ला तुमच्या स्वाधिन करतो," असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले.

.........................................................................................

.........................................................................................

 पन्हाळगडावरून विशाळगडाकडे: वेढयाच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे-पिणे,गाणे-बजावणे,हुक्कापाणी यांत ते दंग होऊन गेले. रात्रीची वेळ होती. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. अधूनमधून विजा चमकत होत्या. या वेळी शिवरायांनी एक मोठे धाडस करायचे ठरवले. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे याच्यासह काही निवडक सैनिकांची एक मोठी तुकडीबरोबर घेतली.एका अवघड वाटेने या सर्वांसह शिवराय गडाबाहेर पडले. सिद्दीच्या वेढ्यातून ते सुखरूप निसटले व विशाळगडाच्या वाटेला लागले.

शिवराय निसटल्याची खबर थोडयाच वेळात सिद्दीला लागली. तो खुप चवताळला. त्याने सिद्दी मसऊद याला मोठया फौजेनिशी महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढयावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली.

बाजीप्रभूचा बाणेदारपणा : चवताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले, आता विशाळगड गाठणे कठिण. ते बाजीप्रभूला म्हणाले, "बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर.आता विशाळगड हाती येत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊ या !" शिवरायांच्या मनातील घालमेलबाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवीत धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते.बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, " महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही.एक बाजी गेला तर तुम्हांला दुसरा मिळेल. पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरु. तुम्ही गडावर पोहचेपर्यंत आम्ही शत्रूला येथे अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा." बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जिवावर आले होते. पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, "आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या."

बाजीने शत्रूला रोखले : बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले.बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तिला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकडया पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या.

मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपपल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, "बहादूर मर्दांनो, हुशार ! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका." बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती.एका वेळी तीन-चार माणसे कशीबशी वर चढू शकत.

तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते.

 खिंडीतील झुंज : इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली टोळी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरु केला, धोंडयाचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्या सराईतपणाने हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली टोळी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी टोळी नेटाने खिंड चढू लागली.बाजीप्रभू ओरडला,"हाणा,मारा." मावळ्यांना स्फुरण चढले.'हर हर महादेव' अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला.बाजी बेहोष होऊन ओरडला,"शाब्बास माझ्या पठ्ठयांनो ! फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना. होऊ द्या जोराचा मारा !शाब्बास तुमची." दुसऱ्या टोळीचा निकाल लागला.

तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूंची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते.

 बाजीचा पराक्रम : इकडे घोडखिंडीत शर्थीची झुंज चालू होती. सिद्दी मसऊद आला होता. त्याची तिसरी टोळी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रु मारला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते.
.........................................................................................

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड (घोडखिंड) येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली. अफझखानासारख्या मोठ्या सेनापतीचा वध केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनीशी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास सांगितले. तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मुघलांशी संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास विनंती केली. सिद्दी जौहरने छत्रपती शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळाकिल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्याय किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.
आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहर कडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फ़क्त ६०० मावळे होते.

.........................................................................................
ती पावनखिंड : एवढयात तोफेचा आवाज कडाडला.
 तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. "महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो," असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला.बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामिनिष्टांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. 'पावनखिंड' या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू !
.........................................................................................

“लाख मेले तरी चालतील पण

लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे”

“...प्रस्थान करा महाराज प्रस्थान करा... आम्ही येथेच त्यांना अडवून ठेवतो... आपण प्रस्थान करा गडावर...”

“...पण बाजी आम्ही कसे निघू कायर प्रमाणे...आपण येथे फक्त तीनशे मावळे धरून त्या सहस्त्र सैनिकांशी कसे लढाल... नाही बाजी नाही आम्ही कदापि येथून गडावर जाणार नाही...”

“...महाराज आपण या स्वराज्याचे राजे आहात... आपल्या कृपेनं हे स्वराज्य बघा सुखीचे श्वास स्पंदत आहे. आपण गडावर लवकरच प्रस्थान करा बघा अन तोफ चालवून आम्हाला संकेत द्या की आपण सुखरूप पोहचलात. तोपर्यंत आपलं मावळे येतीलच की बघा विजय पताका घेऊन...”

“...हे बघा महाराज ती दमण लवकरच खिंडीत पोहचतील आपण शीघ्र प्रस्थान करा... ... आपण प्रस्थान करा.”

« मावळे: “...होय होय महाराज आपण प्रस्थान करा आम्ही ही खिंड लढवतो...आपण आमची कैवारी आहात...आपण छत्र आहात स्वराज्याचे या मुलुखाचे... गडावर प्रस्थान करा”

“...बरं...बरं ! निघतोय आम्ही आपण काळजी घ्यावी... आई भवानी आपणास शक्ती देवो... आम्ही गड-शिखरावर पोहचतात मावळे पाठवितो अन तोफेचा संकेत पाठवतो. ”

हर हर महादेव....आक्रमण... सोडायच नाय कुणाला sss

हुरररररररssssss ....है........ sss

प्रसंग स्मरण झाले काय ! होय हा प्रसंग पावनखिंड लढाई चा आहे. अन ह्या लढाई चे नेतृत्व मुरार बाजीप्रभू देशपांडे करीत होते. सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याला वेढयातुन सुटण्यासाठी बाजींवर महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहचवण्याचे दायित्व होते. बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.

जौहरचे सैन्य अडविताना वीरगतीस प्राप्त झालेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन नावाप्रमाणेच प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. अखेर तलवारी तुटल्या मावळ्यांनी दगडांनी वर करून सैन्यांना अडवले. अखेर बाजीप्रभू धारातीर्थी पडले. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. बाजीप्रभू सम्पूर्णतः स्वराज्याला कामी आलेत...

मराठा मावळ्यांच्या अन बाजीप्रभूंच्या शौर्य व पराक्रमी रक्ताने माखून ती गाजपुरची घोडखिंड पावन झाली म्हणून त्या खिंडीला पावनखिंड संबोधू लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांची समाधी विशाळगडावर बांधण्यात आली......

संदर्भ : गजानन मेहंदळे यांचे राजा शिवछत्रपती ग्रंथ..

.........................................................................................

पावनखिंडीच्या लढाईबद्दल जवळ जवळ ९०% इतिहास चुकीचा सांगितला जातो.

पुढील माहिती मी ‘श्रीशिवभारत’ या कवींद्र परमानंद नेवासकरांनी शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरून लिहिलेल्या ग्रंथातून देत आहे.

शके १५८१ मार्गशीर्ष शुक्ल ७, म्हणजेच १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजलखानास ठार केले.

पुढे अल्ली आदिलशाह ने रुस्तमजमान बरोबर शिवाजी महाराजांवर सैन्य पाठवले होते परंतु ते ही मराठी सैन्यापुढे टिकाव धरू शकलं नाही.

यानंतर शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर गेले आणि नेतोजी पालकाराने महाराजांच्या आज्ञेवरून विजापुरकरांचा मुलुख घ्यायला सुरुवात केली.

या सगळ्या अडचणींमुळे आदिलशाहने औरंगजेब कडे महाराजांच्या विरोधात मदत मागितली. परंतु मोगलांचे सैन्य लवकर पोहोचू शकत नव्हते म्हणून अली आदिलशाह ने कर्नुल चा अधिपती 'सिद्दी जौहर' यास स्वराज्यावर पाठविले.

सिद्दी बरोबर रुस्तमजमान, फाजलखान, बाजी घोरपडा, पीड नाईक, भाई नाईक, सिद्दी मसूद वगैरे सरदार होते.

सिद्दी जौहर ने पन्हाळा ला वेढा घातला. स्वतः किल्ल्याच्या पूर्वेस, घोरपडे वगैरे पश्चिमेस व इतर दक्षिण, उत्तरेस असे होते.

सलग ४ महिने वेढा चालू होता. परंतु जौहर ला काही यश येत नव्हते.

इकडे राजगडावर जिजाऊसाहेब चिंतीत होत्या. त्या स्वतः महाराजांना सोडविण्यासाठी निघाल्या होत्या.

यासाठी कवींद्र परमानंदांनी वापरलेला श्लोक असा की,

"युद्धध्वमिय संभूय यूयमत्र परैः सह ।

स्वयं योत्स्यामि तेनाहं जोहरेण विरोधिना ।।"

म्हणजे - तुम्ही इकडे एकत्र मिळून शत्रूशी झुंजा. मी स्वतः त्या जोहाराशी लढत्ये.

परंतु नेतोजी पालकरांनी त्यांना थांबवलं आणि स्वतः पन्हाळ्याकडे निघाले.

नेतोजी पालकर, सिद्दी हिलाल हे वेढ्यावर वारंवार हल्ले करत होते परंतु त्यांना यश मिळत नव्हते. सिद्दी हिलाल चा मुलगा सिद्दी वाहवाहला जौहरसैन्याने कैद केले.

या सगळ्या बातम्या महाराजांपर्यंत पोहोचतच होत्या. तिकडे शाहिस्तेखान ७७,००० फौजेनिशी पुण्यापर्यंत आला आहे ही बातमी सुद्धा महाराजांना होती.

शेवटी महाराजांनी गडावरून उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्र्यंबक भास्करास किल्लेदारी दिली आणि विशाळगडावरून आलेल्या बाजीप्रभू देशपांडे व ६०० बांदल सैनिकांसमवेत गड उतरण्यास सुरवात केली. सात प्रहरांत पाच योजनें मार्ग आक्रमून महाराजांनी ससैन्य सुखरूप पणे विशाळगड गाठला.

महाराजांनी पन्हाळ्यावरून निघण्याचे ठरवले तेव्हा जौहर कडे एक निरोप पाठवला. त्याचे वर्णन असे की,

"येदिलेन समाहूतैस्तामिः स विषयो मम।

उपक्रांतस्त्वाक्रमितुमतिक्रांतिविकारिभिः।।

अतस्तैरधुना योध्दुमितः प्रस्थीयते मया।

योध्यव्यं बत मे योधैर्युध्दविभ्दिरिह त्वया।।

यदि वास्ति मतिस्तेsद्य व्दंव्दंयुध्दे सकौतुना।

तर्ह्यलंक्रियतामेत्य प्राणालाद्ररुपत्यकाम्।।

स्वेन स्वेन ह्यानीकेन विदूरादवलोकितौ।

योत्स्यावः सोत्सवं तत्र बत निस्त्रिंशधारिणौ।।"

म्हणजे,

"मोंगल आमच्या राज्यावर चालून आले आहेत, त्यांच्याशी लढण्यास मी जात आहे. तेव्हा तू माझ्या येथे असलेल्या योध्दांशी लढ. किंवा माझ्याशी द्वंद्व युद्ध करण्याची इच्छा असेल तर पन्हाळगडाच्या पायथ्याशी ये. तेथे आपण दोघे आनंदाने लढू."

जौहर ने या निरोपास कानाडोळा केला परंतु कडेकोट बंदोबस्त ठेवला. तरीही शिवाजी महाराज निसटलेच. जेव्हा ही बातमी सिद्दीस समजली तेव्हा त्याने सिद्दी मसूद, पाली चा राजा जसवंतसिंह आणि शृंगारपूरचा सुर्याजीराव यास महाराजांच्या पाठी पाठवले.

शेवटी हे सर्व लोक विशाळगडाच्या पायथ्याशी आले. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनीे गडाखाली उतरून मोठे युद्ध केले. त्यांना वीरगती प्राप्त झाली परंतु जौहर च्या सैन्याचा पराभव ही झाला.

यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच.

विशाळगडावरून बाजीप्रभू देशपांडेंबरोबर आलेले मावळे हेच महाराजांचे वाटाडे. त्यांना त्या भागाची इथंबूत माहिती असणारच ना! त्यांनी सुखरूपपणे महाराजांना विशाळगडावर पोहोचवले.

.........................................................................................

पावनखिंडीतील लढाईत वाटाड्यांचा सहभाग होता असे अजून पर्यंत कुठे माझ्या वाचनात आले नाही आणि असा सहभाग असण्याची काही जरूर होती असे मला वाटत नाही कारण मावळ्यांना सह्याद्री त्यांच्या तळहातावरील रेषांइतका ओळखीचा होता.

शिवाजी महाराजाना आणि त्यांच्या मावळ्यांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या, अरण्ये, कडेकपारी, वाटा-चोरवाटा माहीत होत्या. इंग्रज इतिहासकार ग्रँट डफ याने लिहिले आहे की, ‘आपणाला आपल्या घराची वास्तू, त्यातील खोल्या, त्यातील मोकळ्या जागा आणि ठिकठिकाणच्या खाणाखुणा जशा मिट्ट काळोखात देखील माहीत असतात, तसा शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल माहीत होता.’

पावनखिंडीत लढा दिला गेला होता. ती पावनखिंड म्हणजे कासारी नदीचे चिंचोळे पात्र होते या प्रमेयावर हे कथन उभारण्यात आले आहे. जर आजच्या मिलिट्री कमांडरना पन्हागडावरून विशाळगडावर निसटून जायचे असेल तर ते या मोहिमेची आखणी कशी करतील. हे यातून दर्शवण्याचा प्रयत्न आहे.

.........................................................................................

संकलन: सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

१०. शायिस्तेखानाची फजिती

शायिस्तेखानाजी स्वारी: विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले. पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपुला मामा शायिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. आणि एकदा मात्र डोंगराच्या खिंडित मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे ! चटणी-भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्तेख...

६. स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मोगल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड : शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य. ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम केला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.  तोरणा किल्ला शिवरायांचा डोळ्यापुढ...

३.मराठे सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे

धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठ मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई कधीकधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरुळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी ...